डिजिटल व्यवाहाराने बाजारपेठेत सुट्टया पैशाची, चलनी नोटांची चणचण
म्हसवड दि. १४
आर्थिक व्यवहारात अधिक स्पष्टता यावी यासाठी भारत सरकारने डिजीटल ( करंन्सी ) व्यवहार धोरण अवलंबले असल्याने गल्लीपासुन ते दिल्ली पर्यंत सर्वत्र सर्रासपणे आता डिजीटल व्यवहार होत आहेत, त्यामुळे व्यावसायिकांच्या थेट बँक खात्यात रक्कम जात असल्याने दुकानदारांच्या गल्ल्यात कमी अन् खात्यात रक्कम जमा होत आहे, याचा थेट परिणाम बाजारपेठेवर झाला असुन बाजारपेठेत चलनी नोटांची व सुट्टया पैशांची मोठी चणचण भासु लागली आहे.
डिजीटल भारत ची संकल्पना सर्वत्र राबवली जात असल्याने छोट्या दुकानदारांपासुन ते मोठ्या व्यावसायिकांपर्यमत सर्वच ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणावर डिजिटल व्यवहार होत आहेत, आपल्याकडे तुलनेने सर्वाधिक डिजीटल व्यवहार होण्याचे प्रमाण वाढले आहे त्याला शासनाकडुनच चालना दिली जात असल्याने गल्ली ते दिल्ली डिजीटल व्यवहार वाढले आहेत, याचा परिणाम दैनंदिन व्यावसाय करणार्या छोट्या दुकानदारांवर झाला आहे. बाजारपेठेत अगदी ५ रुपयांपासुन ते ५ हजारांपर्यंत चे व्यवहार डिजीटल होत असल्याने बाजारपेठेत चलनी नोटांची कमतरता व्यापार्यांना व सामान्यांही अधिक जाणवत आहे, तर सुट्टया पैशाची ही मोठी चणचण निर्माण झाली आहे.
पूर्वी सुट्टया पैशाचे करायचे काय असा प्रश्न सर्वांसमोर होता आता सुट्टे पैसे ही मिळेनात अशी परिस्थिती झाली आहे. यापुर्वी सुट्टया पैशाची चणचण भासल्यास व्यापारीवर्ग मंदिरातील पुजार्याकडे धाव घेत होता, आता मंदिरातही भाविक दक्षिणा व देणगी ऑनलाइन स्वरुपात देवु लागल्याचे चित्र आहे. दैनंदिन व्यवहारात १००, २०० व ५०० रुपयांच्या नोटा अधिक असल्याने ५०, २० व १० च्या नोटांचे प्रमाण कमी झाले आहे त्याचा परिणाम छोट्या दुकानदारांवर झाला आहे. पुर्वी बँकेतुन रक्कम काढणार्या ग्राहकाला ठरावीक रकमेची चिल्लरची पाकिटे दिली जायची आता तीच पाकिटे शोधण्याची वेळ सामान्य ग्राहक व छोट्या दुकानदारांवर आली आहे, तर दैनंदिन व्यवहारात असलेल्या चलनी नोटांची अवस्था फारच गंभीर आहे.