विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आठवडा उलटून गेल्यानंतरही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी कोण, याबाबत स्पष्टता नसल्याने संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे.
मुंबई : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी भारतीय जनता पक्षाकडून देवेंद्र फडणवीस यांनाच पसंती देण्यात येणार आहे. या बाबतीतील अनिश्चितता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने संपुष्टात आणली असून मंगळवारी भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी फडणवीस यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आठवडा उलटून गेल्यानंतरही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी कोण, याबाबत स्पष्टता नसल्याने संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे भाजपकडून फडणवीस यांच्याऐवजी नवीन चेहऱ्याला भाजप संधी देणार असल्याचा तर्क लावला जात होता. मध्य प्रदेश व राजस्थान या राज्यांमध्ये भाजपने असाच प्रयोग करून नवीन चेहऱ्यांना मुख्यमंत्री केले असल्याने तोच प्रयोग महाराष्ट्रातही राबविला जाईल, असे सांगितले जात होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर दोन दिवसांपूर्वी झालेल्या महायुतीच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्रिपदी फडणवीसच असतील हे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना स्पष्टपणे सांगण्यात आले. निवडणुकीमध्ये फडणवीस यांचाच चेहरा भाजपचे नेते म्हणून वापरला गेला होता. इतकेच नव्हे, तर शहा यांनी एका सभेमध्ये फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठीच महायुतीला निवडून देण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर मात्र अचानक भाजपने पवित्रा बदलून निवडणूक निकालानंतर महायुतीचे नेते एकत्र बसून मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेतील, असे सांगायला सुरुवात केली होती.
….