सातारा जिल्हास्तरीय कार्यशाळेला काही लोकप्रतिनिधींच्या गैरहजरीने झाली पंचायत….

Spread the love

(अजित जगताप )
सातारा दि: राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून सातारा जिल्ह्यात
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कार्यशाळेचे आयोजन केले. मात्र, अनेक लोकप्रतिनिधी गैरहजर झाल्याने आयोजकांची चांगलीच पंचायत झाली. गुरुवारी ११ सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेतील कार्यशाळा दुपारी साडेतीन वाजता गुंडाळण्याची नामुष्की सातारा जिल्हा परिषदेच्या इतिहासातून नोंद झाली.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानाची उद्दिष्टे, भूमिका व जाबाबदाऱ्या या माहिती देण्यासाठी गुरुवार दि. ११ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते सायं. ५ या वेळेत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यशाळेस पालकमंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुगार गोरे, आमदार सचिन कांबळे पाटील व अधिकारी वगळता या कार्यशाळेला निमंत्रण पत्रिकेत नाव असलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले व मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार उदयनराजे भोसले, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार नितीन पाटील, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, माजी मंत्री रामराजे नाईक निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे आमदार महेश शिंदे आमदार मनोज घोरपडे आमदार जयंत तासगावकर आमदार अतुल बाबा भोसले आमदार अरुण लाड तसेच विभागीय आयुक्त पुणे चंद्रकांत पूलकुंडवार मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेला फिरकले सुद्धा नाही. तसेच त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनीही यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह, सातारा या ठिकाणी येण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे आयोजकांची चांगलीच पंचायत झालेली आहे.
या पंचायतराज अभियान कार्यशाळेसाठी ग्रामीण विकास संस्थेचे संचालक डॉक्टर मल्लिनाथ कलशेट्टी, सातारचे जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार जोशी व सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यशानी नागराजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद व सातारा जिल्हा परिषदेचे विभागीय अधिकारी आणि गटविकास अधिकारी, सरपंच आणि सदस्य हे उद्घाघाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.
त्यानंतर दुपारी जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर अनेक जण सभागृहाच्या बाहेर पडल्यामुळे साडेतीन वाजता सर्व सभागृह मोकळे झाले होते. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कार्यशाळा होणार असे माहिती कार्यालयामार्फत प्रसिद्धीपत्र जाहीर केले होते. परंतु, दुपारी साडेतीन वाजता सभागृह रिकामे झाल्यामुळे व अनेक मान्यवरांनी गैरहजेरी दाखवून या महत्वपूर्ण कार्यशाळेला पाठ फिरवली . एवढेच नव्हे तर जिल्हास्तरीय कार्यशाळेची जय्यत तयारी करून सुद्धा पंचायतराज बाबत अभ्यासपूर्ण माहिती असणारे अनेकांना निमंत्रण नसल्यामुळे सातारा जिल्ह्यातील आजी माजी लोकप्रतिनिधी तसेच पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर काम करणारे अनेक जण महत्वपूर्ण कार्यशाळेला उपस्थित राहू शकले नाहीत.
ग्राम विकासाची चळवळ यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सोबत घेऊन अभियान राबवावे. अशी विनंती ग्रामविकास पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी केली होती. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सुद्धा दीपपज्वलन करून या कार्यशाळेबद्दल सकारात्मक रित्या मांडणी केली. महायुतीचे दोन मंत्री व एक आमदार वगळता इतर लोकप्रतिनिधी गैरहजर राहिल्याने अभियान कार्यशाळेचे आयोजकांची चांगलीच पंचायत झाल्याची चर्चा सुरू झालेली आहे.
सध्या सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये अंतर्गत राजकारणातून हिशोब चुकता केला जात आहे. त्यामुळे मंत्री गोरे यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री पंचायत राज अभियान कार्यशाळेला काहीजण जाणीवपूर्वक उपस्थित राहिले नाहीत. कार्यशाळा गुंडाळावी लागली. त्याचे स्पष्ट दर्शन सातारकरांनी सुद्धा अनुभवावे लागले.

अभियानची उदिष्टपूर्तीसाठी व अभियानाची सातारा जिल्ह्यामध्ये प्रभावी अंमलबजावणीसाठी विविधस्तरावर कार्यशाळा घेण्यात आली होती . या कार्यशाळेमध्ये मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाची संकल्पना, रूपरेषा, उद्दिष्टे व अमलबजावणी या विषयी सविस्तर मार्गदर्शन व माहिती, पंचायत व ग्राम स्तरावर करावयाच्या उपक्रमांची माहिती, अभियानात सहभागी होणाऱ्यांच्या जबाबदाऱ्या, प्रभावी नियोजन व कार्यपध्दती या सर्व बाबींवर सविस्तर प्रशिक्षण देण्याचे ठरविण्यात आले होते. पण जेवणावळी नंतर कोणी थांबण्याच्या मनस्थितीत नव्हते. ही बाब अनेकांना प्रबोधन करणारी ठरली आहे.


फोटो –१) साताऱ्यातील जिल्हास्तरीय पंचायतराज अभियान कार्यशाळा दीप प्रज्वलन करताना दोन मंत्री
२)दुपारी साडेतीन वाजता मोकळे झालेले सभागृह

(छाया– अजित जगताप, सातारा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!