
औंध प्रतिनिधी – ओंकार इंगळे
खटाव तालुक्यातील वरुड रस्त्यावर असणाऱ्या गणेश खिंड परिसराच्या मागे मोराळे शिवारा पासून सुरू होणाऱ्या डोंगरास आग लागून वनसंपदा जळून खाक झाली. रखरखत्या उन्हात लागलेल्या या आगीत वन्य प्राणी, सरपटणारे प्राणी ,लहान मोठे किटक मृत्युमुखी पडले . या आगीत जवळपास अंदाजे तीस ते चाळीस एकर डोंगर जळून खाक झाला. ही आग कशाने लागली हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही
औंध गावच्या उत्तरेस असणारा गणेश खिंडी इथून सुरू होणाऱ्या डोंगरापासून दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीने रौद्ररूप धारण केले होते.ही आग बघता बघता जोतिबा डोंगरापर्यंत पोहोचली. त्यातच उन्हाचा तडाखा जोरात असल्याने गवतासह वनसंपदा वाळल्या असल्याने आग पकडून काही तासात डोंगर परिसर जळून खाक झाला. या लागलेल्या आगीबाबत वनविभागाच्या अधिका-यांना याची माहिती दिली. तसेच ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे सर्व ग्रामस्थांना आग विझवण्यासाठी येण्याचे आवाहन करण्यात आले. वनविभागाची यंत्रणा घटनास्थळी पाचारण होईपर्यंत औंध गावातील २५ ते ३० तरुण व औंध होम गार्ड दलातील काही कर्मचारी यांनी एकत्र येऊन झाडांच्या फांद्या तोडून त्याच्या साह्याने जोतिबा डोंगरा जवळ ही आग विझवली.
ही आग आटोक्यात आणण्यासाठी औंध गावातील तरुणांनी वेळेत प्रयत्न केल्यामुळे आग विझवण्यात यश आले अन्यथा ही आग तशीच पुढे जायगाव खिंड इथपर्यंत जाऊन वनसंपदेचे आणखी नुकसान झाले असते. हे सर्व घडत असताना हृदय पिळवटून टाकणारी एक घटना पहावयास मिळाली. एक चिमणी खाली गवत जळत असताना दगडावर बसूनआपले घर शोधत असताना दिसली. हे पाहून औंध करांच्या डोळ्याला पाणी आले. कदाचित चिमणी बोलत असती तर माझे घर पुन्हा उभा राहील का याची तिच्या मनामध्ये असलेली खंत दिसून आली असती.