पुणे .जेष्ठ लेखिका व समाजसेविका डॉ. दुर्गा विश्वनाथ दीक्षित यांनी त्यांच्या किशोर वयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून सुरू केलेल्या शैक्षणिक कारकिर्दीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिंदी विभागप्रमुख पदापर्यंत प्रगती केली. त्या १९६२ सालच्या इंग्रजी व हिन्दी विषयात विद्यापीठात प्रथम आलेल्या होत्या आणि १९७० साली त्यांनी हिंदी विषयात पीएचडी पूर्ण केलेली असून त्या पुण्यातील हिंदी व संस्कृत शिकवणाऱ्या पहिल्या शिक्षकांपैकी एक होत्या. त्यांचे नुकतेच वयाच्या ८६ व्या वर्षी दीर्घ आजाराने दि.६ जुलै २०२५ रोजी पहाटे सकाळी ४.३० वाजता आषाढी एकादशी दिनी दु:खद निधन झाले.त्यांचे मागे दोन भाचे विक्रम आणि विवेक विजय दाते असून त्यांनी डॉ. दुर्गा विश्वनाथ दीक्षित यांची मनोभावे दीर्घकाळ सेवा केली आहे.
स्वेच्छानिवृत्तीनंतर त्यांनी ऐक्यभारती रिसर्च इन्स्टिट्यूट व ऐक्यभारती प्रतिष्ठानची स्थापना केली, त्या माध्यमातून त्यांनी संशोधन, प्रकाशन, परिषदांचे आयोजन तसेच विद्यार्थ्यांसाठी व व्यावसायिकांसाठी कौशल्यविकासाचे अनेक अभ्यासक्रम चालवले.त्यांनी महिलांसाठी अनेक प्रकारची शिबीर आयोजित करून महिलांना सक्षम बनविण्याचे कार्य केले.तसेच त्यांनी महाराष्ट्र लोकसाहित्य परिषद ,दलित नाट्य संमेलन ,आणि बहुभाषा-युवा अभिव्यक्ती वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन व संयोजन केले असून त्यांनी विविध परदेशी भाषा शिकविण्याचे क्लासेस घोले रोड येथील महात्मा फुले संग्राहालयमधून बरेच वर्ष चालविले आहेत.
डॉ. दीक्षित यांचे रससिद्धान्त का सामाजिक मुल्यांकन,नाटक और नाट्यशैलिया, महाराष्ट्र का लोकधर्मी नाट्य,हिंदी रंगमंच का अलक्षित संदर्भ व इतर ग्रंथ प्रकाशित असून त्यांची अमेझॉन वर डायमंड महाराष्ट्र संस्कृती कोश आणि माझा भारत आपला भारत मराठी व हिंदी मध्ये ग्रंथ उपलब्ध आहेत. त्यांनी अनेक पुस्तकांचे हिंदी,मराठी अनुवाद केलेले आहेत. त्यामध्ये समाजसेवक लेखक सत्यशोधक रघुनाथ ढोक यांचे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले मराठी ग्रंथाचे हिन्दीत अनुवाद मोफत करून दिले असून महात्मा फुले समग्र वाड्मय ची १९६८ ची पहिली आवृत्ती व दुर्मिळ ग्रंथ देखील त्यांनी रघुनाथ ढोक यांना भेट दिलेले आहेत. आणि त्यांचे संत वाड्मय की सामाजिक फलश्रुती प्रकाशनाच्या मार्गावर आहे.
डॉ.दीक्षित यांची इटलीतील ओरिएंटल युनिव्हर्सिटी नेपल्समध्ये हिंदी अध्यापनासाठी भारत सरकारकडून नेमणूक केलेली होती. त्या महाराष्ट्र हिन्दी परिषद चे संस्थापक अध्यक्षा होत्या तर भारत सरकार राजभाषा समिती चे सदस्य म्हणून देखील काम केलेले होते.त्या फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अॅन्ड सोशल फौंडेशनच्या व इतर संस्थांच्या मार्गदर्शिका होत्या, तसेच त्यांचा अनेक सामाजिक संस्थेने सन्मान केला असून बिहार राष्ट्रभाषा परिषदेतर्फे मोठा सन्मान केला आहे.
